पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार

पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पंढरपूर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस प्रशासनाने वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढं करत आमदार रोहित पवार यांना नोटीस बजावली होती आणि आंदोलनासाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेले आंदोलनस्थळ बदलणार नसल्याची ठाम भूमिका घेत त्यांनी नियोजित ठिकाणीच आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी आणि निकषांवर तीव्र आक्षेप घेतला असून सर्व पात्र शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारवर हल्लाबोल केला. पंढरपूर हे सर्व भक्तांसाठी खुले असताना आंदोलनाच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला शांततामय आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगत, प्रशासकीय दबावामुळे हे आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य सरकारने नुकतीच सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, या योजनेतील विविध अटींमुळे शेतकरी संघटनांमध्ये नाराजी असून बुधवारी मंचर येथे शासनाच्या आदेशाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला होता.

COMMENTS