बुलढाणा : राज्यभरात सुरू असलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत शेगाव येथील एका प्रसिद्ध कचोरी केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अचानक

बुलढाणा : राज्यभरात सुरू असलेल्या अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत शेगाव येथील एका प्रसिद्ध कचोरी केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने अचानक तपासणी करत मोठी कारवाई केली. कचोरी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध कच्च्या मालाचे नमुने पथकाने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीत कोणतीही भेसळ अथवा निकृष्ट दर्जाचे घटक आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून शेगावमधील प्रसिद्ध कचोरी विक्री केंद्रावर गुरुवारी सायंकाळी अचानक छापा टाकण्यात आला. निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कचोरी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची बारकाईने पाहणी केली आणि नमुने संकलित केले. शेगाव येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि येथील कचोरी हा अनेकांचा आवडता खाद्यपदार्थ मानला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच मुंबईतील मुलुंड परिसरातही अशीच मोठी कारवाई केली होती. तेथील एका खाद्यपदार्थ विक्री आस्थापनामध्ये अस्वच्छ परिस्थिती आणि आवश्यक माहिती नसलेली पॅकेट्स आढळल्याने मोठा साठा जप्त करून व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. जप्त केलेल्या पदार्थांमध्ये चणे, शेव, मुरमुरे, वाटाणे आणि संशयास्पद रंगद्रव्यांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
औषध वितरणाबाबतही नियमांच्या अंमलबजावणीची मागणी याच पार्श्वभूमीवर औषध विक्री केंद्रांमध्ये (Medical Stores) पात्र आणि नोंदणीकृत फार्मसिस्टची (औषधतज्ज्ञ) उपस्थिती अनिवार्य करण्याची मागणी पुढे आली आहे. औषधांचे वितरण केवळ प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हावे, तसेच मेडिकल परवाने भाड्याने देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यात यावा, अशी मागणी संबंधित संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्न सुरक्षा आणि औषध वितरण या दोन्ही क्षेत्रांत नियमांचे काटेकोर पालन होणे नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

COMMENTS