नांदेड : नीट (यूजी) 2026 फेरप्रवेश परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून परीक्षार्थ्यांची वैद्यकीय
नांदेड : नीट (यूजी) 2026 फेरप्रवेश परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून परीक्षार्थ्यांची वैद्यकीय अधिकार्यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ब्लूटूथ, इअरबड्स आदी प्रतिबंधित वस्तूंचा वापर रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित नीट (यूजी) 2026 फेरप्रवेश परीक्षा 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात यासाठी एकूण 42 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्यापैकी 25 केंद्रे नांदेड शहरात तर 17 केंद्रे ग्रामीण भागात आहेत. परीक्षार्थ्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असून सकाळी 11 ते दुपारी 1.30 या कालावधीत तपासणी प्रक्रिया पार पडणार आहे. गैरमार्गांचा अवलंब टाळण्यासाठी परीक्षार्थ्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इअरबड्स किंवा तत्सम साधनांबाबत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांकडून पडताळणी केली जाणार आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मजकूर साहित्य, लिखित अथवा मुद्रित कागद, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राइव्ह, इलेक्ट्रॉनिक पेन-स्कॅनर तसेच इतर कोणतीही स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. अशा वस्तू आढळल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानून संबंधित उमेदवाराविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल. परीक्षार्थ्यांनी आयोगाने निर्धारित केलेल्या पोशाख संहितेचे काटेकोर पालन करावे. जड पोशाख, पूर्ण बाह्यांचे शर्ट तसेच तपासणीस अडथळा निर्माण करणारे कपडे टाळावेत. सांस्कृतिक किंवा पारंपरिक पोशाख परिधान करणार्या उमेदवारांनी सकाळी 11.30 पूर्वी तपासणी पूर्ण करून घ्यावी. तसेच ओळख पटविताना चेहरा आणि दोन्ही कान स्पष्ट दिसतील याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय वॉलेट, गॉगल, हँडबॅग, बेल्ट, कॅप, मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा, दागिने, खाद्यपदार्थ, अपारदर्शक पाण्याच्या बाटल्या तसेच मायक्रोचिप, ब्लूटूथ, मायक्रो कॅमेरे आणि अन्य संप्रेषण साधने परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व परीक्षार्थ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

COMMENTS