मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित चित्रफीत प्रकरणात आता नव्या घडामोडींनी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झ

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित चित्रफीत प्रकरणात आता नव्या घडामोडींनी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. संबंधित आरोपी तरुणाने आता न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारत नवे आरोप मांडले आहेत.
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका आक्षेपार्ह चित्रफितीत मंत्री झिरवाळ हे एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत असल्याचा दावा करण्यात आला होता. या चित्रफितीमुळे राजकीय व सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तृतीयपंथीय व्यक्तीने आपल्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी भावाने आता मुंबई उच्च न्यायालय याचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्या विरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत त्याने गंभीर स्वरूपाचे प्रत्यारोप करत, स्वतःला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या मते, त्याच्याविरोधातील सर्व आरोप निराधार असून उलट संबंधित तृतीयपंथीय व्यक्तीकडूनच खंडणी उकळण्याचा, दबाव टाकण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे. तसेच, संबंधित पोलिस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा युक्तिवादही त्याने मांडला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, असे त्याचे म्हणणे आहे. या नव्या घडामोडींमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुढे न्यायालय काय भूमिका घेते आणि तपास यंत्रणा कोणती दिशा ठरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे राजकीय पातळीवर या घटनेचे पडसाद उमटत असताना, दुसरीकडे सामाजिक दृष्टिकोनातूनही या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

COMMENTS