मुंबई : वारकरी संप्रदायाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भिन्न मतप्रवाह सुरू असतांनाच खा. शरद पवार यांनी वारकरी परंपरेबाबत केलेल्या वक्

मुंबई : वारकरी संप्रदायाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भिन्न मतप्रवाह सुरू असतांनाच खा. शरद पवार यांनी वारकरी परंपरेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सामाजिक वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राजधानी दिल्ली येथील महिला शासकीय अधिकार्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी मांडलेली भूमिका लक्षवेधी ठरत असून, वारकरी चळवळीतील बदलत्या प्रवाहांबाबत त्यांनी स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली आहे.
खा. पवार यांनी आपल्या लेखात नमूद केले की, समता, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश देणार्या वारकरी परंपरेत अलीकडच्या काळात काही प्रतिगामी विचारसरणींची घुसखोरी होत असल्याचे जाणवते. या प्रवृत्तीमुळे या चळवळीचा मूळ आशय आणि समाजपरिवर्तनाचा उद्देश कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या मते, काही ठिकाणी धार्मिक कट्टरतेला पोषक अशी मांडणी पुढे येताना दिसते, जी वारकरी परंपरेच्या मूळ मूल्यांशी विसंगत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या लेखात त्यांनी असेही निरीक्षण नोंदवले की, या संप्रदायातील लक्षणीय घटकांकडून प्रबोधनाऐवजी परंपरावादी आणि संकुचित विचारांना चालना दिली जात आहे. वारकरी चळवळीने इतिहासात समाजजागृती, समतेचा पुरस्कार आणि अंधश्रद्धेविरोधी विचार रुजवण्याचे कार्य केले; मात्र सध्याच्या घडामोडी त्या परंपरेपासून दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याच संदर्भात पवार यांनी काही सकारात्मक बाबींचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, अजूनही काही कीर्तनकार आणि प्रवचनकार समाजप्रबोधनाची भूमिका ठामपणे मांडत आहेत. अशा सुमारे चाळीस जणांची नोंद घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींच्या माध्यमातून प्रगत आणि विवेकाधिष्ठित विचार समाजापर्यंत पोहोचत असून, त्यांची संख्या वाढणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. खा. पवार यांनी वारकरी चळवळीत महिलांच्या सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित केला. प्रबोधनाच्या या महत्त्वपूर्ण प्रवाहात महिलांचा सहभाग अपेक्षित प्रमाणात दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांचा समतोल आणि सक्रीय सहभाग असला, तरच कोणतीही चळवळ अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री करणार संमेलनाचे उद्घाटन
या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, देशभरातील महिला शासकीय अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक विषयांवर चर्चा होणार्या या व्यासपीठावर पवार यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, वारकरी परंपरेच्या मूलभूत तत्त्वांवर नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करणारे हे विधान ठरत असून, समता आणि प्रबोधनाचा वारसा जपण्याबाबतची जबाबदारी समाजासमोर पुन्हा एकदा ठळकपणे उभी राहिली आहे.

COMMENTS