गेवराई: शहरात बनावट ओळखपत्रे (आधार कार्ड) तयार करून नोटरीद्वारे महिंद्रा थारची विक्री केल्यानंतर काही दिवसांनी जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने तीच गाडी

गेवराई: शहरात बनावट ओळखपत्रे (आधार कार्ड) तयार करून नोटरीद्वारे महिंद्रा थारची विक्री केल्यानंतर काही दिवसांनी जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने तीच गाडी पुन्हा चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा गेवराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत चोरीस गेलेली महिंद्रा थार आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली अर्टिगा कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणातील मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला आहे.
फिर्यादी राज भुराजी शिंदे (रा. महात्मा फुले नगर, गेवराई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी १५ जुलै २०२६ रोजी बसवराव महादेव म्हासाळकर यांच्या नावावरील महिंद्रा थार (क्र. MH 14 GD 5858) नोटरी करून खरेदी केली होती. मात्र, १९ जुलैच्या मध्यरात्री त्यांच्या घरासमोर उभी असलेली ही गाडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी प्रथम गाडीच्या मूळ मालकाच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले. त्या कार्डावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो लावून तोच गाडीचा मालक असल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी करून गाडीची विक्री करण्यात आली. गाडी विकल्यानंतर आरोपींनी वाहनात आधीपासून बसवलेल्या जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने तिचे थेट लोकेशन शोधले आणि त्यांच्याकडे असलेल्या डुप्लिकेट चावीचा वापर करून फिर्यादीच्या ताब्यातील थार अवघ्या तीन-चार दिवसांत पुन्हा चोरी केली.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २८ जुलै रोजी गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोन वेळा अहिल्यानगर येथे धाड टाकून शिवडी तपोवन रोड परिसरातून चोरीस गेलेली महिंद्रा थार हस्तगत केली.
प्राथमिक तपासात आरोपींनी यापूर्वीही हीच थार अशाच प्रकारे आणखी दोन व्यक्तींना नोटरी करून विकल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी किमान तीन आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड, हिमांशु नागरे, कल्याण राठोड, अमोल सोनवणे, अश्वीन (विक्की) सुरवसे आणि ऋषिकेश पोटे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

COMMENTS