Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरवासियांना खूष खबर…मध्य शहरातील पाच रस्त्यांचे होणार डांबरीकरण

शासनाच्या निधीत मनपा घालणार सुमारे साठ लाखाची भर

अहमदनगर/प्रतिनिधी ः नवीन वर्षाची खूषखबर नगर शहरवासियांना मनपाने दिली आहे. मोटोक्रॉस स्पर्धेला लायक ठरतील अशा स्थितीतील मध्य नगर शहरातील पाच रस्त

संकलित कर थकबाकीचे पैसे आणा, नाहीतर दंडाला सामोरे जा…
नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज
अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

अहमदनगर/प्रतिनिधी ः नवीन वर्षाची खूषखबर नगर शहरवासियांना मनपाने दिली आहे. मोटोक्रॉस स्पर्धेला लायक ठरतील अशा स्थितीतील मध्य नगर शहरातील पाच रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यासाठी शासनाने दिलेल्या 10 कोटीच्या निधीतून उरलेल्या रकमेत आणखी सुमारे 60 लाखांची भर मनपा घालणार आहे.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी महासभेत घेतलेल्या निर्णयानुसार मध्य नगर शहरातील रामचंद्र खुंट ते तेलीखुंट ते नेता सुभाष चौकपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (दाळमंडई, झंवर ते तेलीखुंट पॉवर हाऊस, आडतेबाजार, काळूराम मंगलचंद कोठारी ते झंवर वगळून), अहमदनगर वाचनालय ते चितळेरोड ते चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट वेशीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, नगर वाचनालय ते भाजप कार्यालय ते पटवर्धन चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, तख्ती दरवाजा ते घुमरे गल्ली ते लक्ष्मी कारंजापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे आणि शहर सहकारी बँक ते नवीपेठ ते लोढा हाईट्सपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ही पाच प्रमुख रस्त्यांची कामे येत्या काही दिवसांत मार्गी लागणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात 10 कोटी रुपयांच्या निधीतून बहुतांश कामे प्रस्तावित आहेत. वाढीव दर पत्रकांना मंजुरी व त्यानंतर कामे रखडल्यामुळे या कामांचा खर्च वाढला. या निधीतील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम मोठी असल्याने व प्रस्तावित कामांच्या निविदा या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या असल्याने महापालिका प्रशासनाला निधी उपलब्ध करून देण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही कामे घेतलेल्या ठेकेदाराने कामाचा खर्च वाढल्याने जुन्या दराने कामे करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने यासाठी 50 ते 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करीत पाच प्रमुख रस्त्यांची कामे मार्गे लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कदम यांनी दिली.

महापालिकेने या कामांसाठी आता पुढाकार घ्यावा, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार रखडलेल्या रस्त्यांपैकी पाच प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर शेंडगे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देत प्रशासनाची तांत्रिक अडचण दूर केली आहे. हे पाच प्रमुख रस्ते मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कमी पडणारा 50 ते 60 लाख रुपयांचा निधी महापालिका उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न नवीन वर्षात मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची उर्वरित कामेही मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनपाला होती तांत्रिक अडचण – भुयारी गटार योजना, पाणी योजना आदी कामामुळे मध्य नगर शहरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे मंजूर असल्याने महापालिकेला या ठिकाणी नव्याने कामे मंजूर करता येत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागही यातून मार्ग काढायला तयार नव्हते. त्यामुळे मनपासमोर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.

COMMENTS