अहिल्यानगर : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातून एक अत्यंत हृद

अहिल्यानगर : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. माहेरून ४ लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून, एका २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
ही खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. प्रिया शुभम ढगे असे या मृत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता. २०१४ ते २०२६ या दोन वर्षांच्या काळात प्रियाचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
वारंवार होणारा हा त्रास सहन न झाल्याने अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलले आणि विहिरीत उडी घेतली. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी तत्परता दाखवत पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
जिल्ह्यात हिंसेच्या घटना वाढत असतानाच, श्रीरामपूरमधूनही अशीच एक धक्कादायक बातमी आली होती. तिथे कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने वार करून हत्या केली. १ मे रोजी घडलेल्या या घटनेने जिल्हा आधीच हादरलेला असताना, आता या विवाहितेच्या आत्महत्येमुळे कौटुंबिक कलहाचा भीषण चेहरा पुन्हा समोर आला आहे.
हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे एका तरुण मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, अशा घटनांमुळे समाजातील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

COMMENTS