आष्टी : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसात खंड पडणे तसेच उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त के

आष्टी : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसात खंड पडणे तसेच उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना घाबरून न जाता वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने खरीप हंगामाचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
आमदार धस म्हणाले की, बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. शेततळी, विहिरी, बंधारे तसेच जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांद्वारे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यावर भर द्यावा. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीची, दुष्काळ सहनशील आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या वाणांची निवड करावी. एल निनोच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी पावसाच्या आगमनानुसार टप्प्याटप्प्याने पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रिया करणे, तसेच ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरपीक पद्धतीचा अवलंब, सेंद्रिय खतांचा वापर, पीक अवशेषांचे आच्छादन (मल्चिंग), ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केल्यास कमी पावसाच्या परिस्थितीतही उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते, असे आमदार धस यांनी स्पष्ट केले. याशिवाय हवामान आधारित कृषी सल्ल्याचे नियमित पालन करणे, पावसात दीर्घ खंड पडल्यास जीवनरक्षक सिंचनाची व्यवस्था करणे आणि पीक विमा योजनांचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत हवामान आधारित सल्ला, दर्जेदार बियाणे आणि तांत्रिक मार्गदर्शन वेळेवर पोहोचवावे, अशा सूचनाही आमदार धस यांनी दिल्या. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन केल्यास एल निनोच्या संभाव्य परिणामांवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.

COMMENTS