अकोले : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या १६ घटक संघटनांच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व परिमंडळ कार्यालया
अकोले : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या १६ घटक संघटनांच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व परिमंडळ कार्यालयांसमोर प्रस्तावित करण्यात आलेले उपोषण व अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर १७ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ही माहिती महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे विभागीय सचिव अमोल आभाळे यांनी दिली. तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान, पेन्शन योजना, वीज क्षेत्रातील खासगीकरणाला विरोध, वेतनवाढ करारातील त्रुटी यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने ५ ऑगस्ट रोजी उपोषण व अन्नत्याग आंदोलनाची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २) नागपूर येथील ‘रामगिरी’ शासकीय निवासस्थानी कृती समितीच्या १६ घटक संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. १७ जुलै रोजी सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. कृती समितीच्या मागण्यांवर पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच ५ ऑगस्टचे उपोषण व अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा आदर राखत नागपूर येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत ५ ऑगस्टचे आंदोलन १७ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व परिमंडळ कार्यालये, वीज केंद्रे तसेच परिमंडळ कार्यालयापासून ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील मंडळ कार्यालयांसमोर द्वारसभा घेण्यात येणार आहेत. या सभांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती, आंदोलनाची पुढील दिशा आणि संघटनेची आगामी रणनीती कर्मचाऱ्यांना सांगण्यात येणार आहे.

COMMENTS