मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता मोठा राजकीय आणि कायदेशीर वाद समोर आला आहे. महानगरपालिकेतील तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्याया

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता मोठा राजकीय आणि कायदेशीर वाद समोर आला आहे. महानगरपालिकेतील तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू झाली असून, आगामी न्यायालयीन निर्णयांचा मुंबईच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विधी विभागाकडे निवडणुकीनंतर दाखल झालेल्या याचिकांची माहिती मागवली होती. त्यानंतर महानगरपालिकेच्या विधी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीत अनेक प्रभागांतील निवडणूक निकालांविरोधात हरकती नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या याचिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान नियमांचे पालन झाले नाही, उमेदवारी अर्ज तपासताना त्रुटी राहिल्या, प्रचारादरम्यान निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले, काही ठिकाणी मतदार यादीबाबत तक्रारी होत्या, तर काही उमेदवारांनी आवश्यक माहिती लपवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या सर्व मुद्द्यांच्या आधारे पराभूत उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या याचिका केवळ एका पक्षाविरोधात नसून विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांविरोधात दाखल झाल्या आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या प्रतिनिधींच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद केवळ राजकीय न राहता संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेशी जोडला जात आहे. न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये मुंबईतील महत्त्वाच्या विभागांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. ‘एच पूर्व’, ‘के पूर्व’, ‘एस’, ‘एम पूर्व’, ‘एफ उत्तर’, ‘आर उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या विभागांतील अनेक नगरसेवकांविरोधात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या प्रभागांतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 119 मधील एका प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला आहे. मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. मात्र, संबंधित याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे. तरीदेखील उर्वरित बहुतांश प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणांवर परिणाम?
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेली स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. अनेक वर्षे ठाकरे गटाच्या प्रभावाखाली राहिलेल्या या महापालिकेत यंदाच्या निवडणुकीत मोठे राजकीय बदल पाहायला मिळाले. भाजपने 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला 24, एमआयएमला 8, मनसेला 6, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3, समाजवादी पक्षाला 2 आणि शरद पवार गटाला 1 जागा मिळाली होती.

COMMENTS