नांदेड : शहरातील गुरुगोविंदसिंहजी क्रिकेट स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडे तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची चर्

नांदेड : शहरातील गुरुगोविंदसिंहजी क्रिकेट स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडे तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची चर्चा रंगत असतानाच, दुसरीकडे या स्टेडियमची सद्यस्थिती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. मोठमोठ्या घोषणांचा गाजावाजा होत असला तरी प्रत्यक्षात मैदानावरील मूलभूत सुविधांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालल्याने स्थानिक खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नांदेडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमान मानले जाणारे हे स्टेडियम गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय आश्वासनांचे केंद्र बनले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांची स्वप्ने दाखवली गेली, अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे दावे झाले; मात्र आजही मैदानातील गॅलरींची दुरवस्था, सरावासाठी आवश्यक आधुनिक उपकरणांचा अभाव, खेळाडूंना दर्जेदार ड्रेसिंग रूमची कमतरता तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येमुळे स्थानिक क्रिकेटपटूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत विविध स्तरांवरून स्टेडियम विकासाचे प्रस्ताव केवळ कागदावरच राहिल्याची टीका होत आहे. विरोधकांनी याला ‘घोषणांचा पाऊस आणि कामांचा दुष्काळ’ असे संबोधत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नांदेडमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही, मात्र सुविधांअभावी अनेक खेळाडूंना पुणे, मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतर करावे लागत आहे. निवडणुकीपुरता वापरल्या जाणाऱ्या या मुद्द्यावर आता केवळ आश्वासने नको तर मैदानावर प्रत्यक्ष बदल दिसण्याची अपेक्षा खेळाडू व नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS