नायगाव: तालुक्यातील मांजरम वाडी शिवारात मंगळवारी पहाटे झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळून शेतकरी मारुती माणिकराव छपरे यांच्या शेतातील कडब्याच

नायगाव: तालुक्यातील मांजरम वाडी शिवारात मंगळवारी पहाटे झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळून शेतकरी मारुती माणिकराव छपरे यांच्या शेतातील कडब्याची गंजी जळून खाक झाली. या दुर्घटनेत जनावरांच्या चार्याचा मोठा साठा नष्ट झाल्याने शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
पहाटे दोन वाजता दुर्घटना; ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास परिसरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. त्याचवेळी अचानक वीज थेट कडब्याच्या गंजीवर कोसळली. काही क्षणांतच गंजीने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा पाहून ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कडबा जळून राख झाला होता. या आगीत मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या चार्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पशुधनासाठी साठवून ठेवलेला चारा नष्ट झाल्याने शेतकरी मारुती छपरे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी केली. तसेच तलाठी अनुपवाड व कृषी सहाय्यक मैसनवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्याला त्वरित मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक शेतकर्यांनीही प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

COMMENTS