अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी १० ते १५ जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत धीरज परदेशी गंभीर जखमी झाले होते. गेल्या तीन दिवसा

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी १० ते १५ जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत धीरज परदेशी गंभीर जखमी झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत कापड बाजारपेठेतील दुकाने बंद केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिकेच्या कंत्राटी संस्थेचे कर्मचारी धीरज करमसिंग परदेशी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी दांडक्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या हल्ल्याच्या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शनिवारी रात्री फरार मुख्य चार आरोपी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक केली आहे. तर धीरज परदेशी यांच्यावर झालेला हल्ला कोणत्या कारणाने झाला होता, त्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे. मात्र, तो हिंदुत्ववादी होता म्हणून त्याला मारण्यात आल्याचा आरोप धीरज यांच्या पत्नीने केला आहे. तर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे.
धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी समोर येताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मयत धीरज परदेशी यांच्या पत्नीचा आक्रोश धीरज परदेशी यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरल्यानंतर त्यांच्या पत्नीने टाहो फोडला होता. आक्रोश करत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच माझ्या पतीला ज्या ठिकाणी मारहाण केली, त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याची मागणी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

COMMENTS