किनवट,गोकुंदा शहरातील रस्ते म्हणजे जणू काही स्टंटबाजांचे रेस ट्रॅक झाले आहेत, असा संताप सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत होता. पण आता या टवाळखोरां

किनवट,गोकुंदा शहरातील रस्ते म्हणजे जणू काही स्टंटबाजांचे रेस ट्रॅक झाले आहेत, असा संताप सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत होता. पण आता या टवाळखोरांचे आणि सायलेन्सर बदलून कानठळ्या बसवणार्या बुलेटस्वारांचे ’काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. किनवटचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी पदभार स्वीकारताच अशा समाजकंटकांना कडक शब्दांत तंबी दिली असून, आज सोमवारपासून थेट गाड्या जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोकुंदा आणि परिसरात मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट झाला आहे. भरवस्तीत आणि शाळा-कॉलेजेससमोर बंदुकीच्या गोळीसारखे आवाज (फटाके) काढून दहशत निर्माण करणार्या या स्टंटबाजांमुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण कमालीचे त्रस्त आहेत. वाहनांमध्ये विनापरवाना बदल करणे हा गुन्हा आहे. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी शासकीय कामाचा किंवा कारवाईचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केल्यास, थेट कडक गुन्हे दाखल होतील, असा सज्जड दमच उपविभागीय पोलीस अधीकारी कदम यांनी दिला आहे. केवळ आवाजाचे प्रदूषणच नाही, तर कोचिंग क्लासेस आणि शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थिनींचा पाठलाग करणार्या टवाळखोरांचे प्रमाणही धक्कादायक रित्या वाढले आहे. या ’रोमिओ’गिरीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पालकांच्या आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेत आता छेडछाड विरोधी पथकाची (दामिनी पथक) गस्त वाढवण्यात येणार आहे. पोलिसांनी आता केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट गाड्या जप्त करण्याचा पवित्रा घेतला आहे. किनवट आणि गोकुंदा परिसरातील शांतता प्रिय नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. आता सोमवारपासून पोलिसांचा हा ’बडगा’ नेमका कसा चालतो आणि या टवाळखोरांना चाप बसतो का, याकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत.

COMMENTS