Screenshot नवी दिल्ली : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध समस्यांसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.27 मार्च

नवी दिल्ली : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध समस्यांसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी दि.27 मार्च रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. सोलापूरच्या उजनी धरणातून मांजरा नदीमार्गे मांजरा धरणात पाणी आणण्याचा प्रकल्प त्वरित मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी करत त्यांनी बीडच्या दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीडचे खा.बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी दुष्काळ आणि अस्मानी संकटाबाबत खा.सोनवणे यांनी आपल्या भाषणात बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले की, बीडचा शेतकरी दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसतोय. यावर्षी त्यात वादळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाची भर पडली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे कष्टाचे पीक डोळ्यादेखत मातीत जात असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत असून ही बाब अत्यंत गंभीर आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. बीड जिल्ह्यातील दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी बाहेरून जिल्ह्यात पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी उजनीचे पाणी मांजरा धरणात आणणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सोनवणे यांनी ठामपणे सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बीडच्या शेतकर्यांसाठी ते ’जीवनदायी’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिरंगाईवर ओढले ताशेरे
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना वेळेत कर्ज मिळत नाही, शेतीच्या योजनांचा लाभही उशीरा मिळतो, एकूणच जिल्ह्यातील प्रशासकिय दिरंगाई कमी व्हावी, असेही ते म्हणाले. , शेतकर्यांना कर्जव्याज सवलत, अनुदान आणि पीकविम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. हक्काच्या पैशांसाठी बळीराजाला बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात., सोयाबीन, मका, तूर आणि ज्वारीची हमीभावाने खरेदी तर होते, पण त्याचे पैसे मिळायला महिनोन् महिने वाट पाहावी लागते. हा अन्याय तातडीने थांबवून चुकारे वेळेत देण्याची मागणी त्यांनी केली., व्याज सवलतीसारख्या अनेक योजना कागदावरच राहतात. पात्र शेतकर्यांना या योजनांपासून वंचित ठेवणार्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी संबंधित मंत्रालयाकडे केली.
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, मदत आणि न्याय मिळेपर्यंत माझा हा लढा थांबणार नाही. बीडच्या शेतकर्याचा आवाज मी संसदेत असाच बुलंद ठेवेन. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने दिल्लीत पाठविले असून मी त्यांचे प्रश्न मांडण्यास कमी पडणार नाही. -खा.बजरंग सोनवणे, बीड.

COMMENTS