नागपूर : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व

नागपूर : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी एकमताने पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असून, त्यातून राज्याच्या राजकीय संस्कृतीचा आदर्श पुढे येईल, असे मत व्यक्त केले.
फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्रात यापूर्वीही काही प्रसंगी राजकीय पक्षांनी व्यापक विचार करून बिनविरोध निवडणुका घडवून आणल्या आहेत. अशा परंपरेचा दाखला देत त्यांनी सर्व पक्षांनी मोठेपणा दाखवून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही अशाच प्रकारे एकमत झाले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना विधिमंडळाचे सदस्यत्व आवश्यक ठरल्याने त्या बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. येत्या सहा एप्रिल रोजी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि मतदारांशी थेट संपर्क मोहीम सुरू झाली असून, वातावरणात निवडणुकीची चाहूल लागली आहे.
काँग्रेसचा स्पष्ट नकार, लढत निश्चित
बिनविरोध निवडणुकीच्या मागणीला मात्र काँग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय कायम असल्याचे जाहीर केले. पक्षाने याबाबत पूर्वीच भूमिका स्पष्ट केली असून त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आणि अजित पवार गटाकडून सातत्याने बिनविरोध निवडणुकीचे आवाहन होत असले, तरी काँग्रेसने लोकशाही प्रक्रियेवर भर देत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच नाव जाहीर केले जाईल, अशी माहितीही सपकाळ यांनी दिली. तसेच, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्यांशीही संवाद साधल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS