बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) तांदळवाडी घाट (ता. बीड) येथील पानंद रस्त्यांच्या कामात मोठ्या अनियमितता झाल

बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) तांदळवाडी घाट (ता. बीड) येथील पानंद रस्त्यांच्या कामात मोठ्या अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काम अपूर्ण असतानाही पूर्ण झाल्याचे खोटे अहवाल सादर करण्यात आले असून, बनावट जिओ-टॅग फोटो आणि मजुरांचे खोटे जबाब जोडून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केला आहे.
यासंदर्भात सोनवणे यांनी पंचायत समिती बीडचे गटविकास अधिकारी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे, तांदळवाडी घाट परिसरातील आठ रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असतानाही चौकशी समितीकडून पूर्णत्वाचा खोटा अहवाल देण्यात आला आहे. यासोबत बनावट जिओ-टॅग फोटो व मजुरांचे खोटे जबाब जोडून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गटविकास अधिकार्यांनी कोणतीही शहानिशा न करता संबंधित कामाची रक्कम एमआरजीएस खात्यात जमा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौकशी प्रक्रियेवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. गटविकास अधिकार्यांनी नेमलेल्या समितीत सहाय्यक गटविकास अधिकार्यांचे नाव नसतानाही इतर अधिकार्यांनी-वाघ बी.जी. (शाखा अभियंता), पोकळे, शिंदे आर.जी., जामकर एस.एस., आमटे ए.बी. आदींनी-खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम न करता निधी उचलण्याची तयारी सुरू असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले. सदर कामाचे कोणतेही देयक अदा करू नये, अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर फौजदारी कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, स्थानिक ग्रामस्थ आणि पँथर सेना कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS