अहिल्यानगर : राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अं
अहिल्यानगर : राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अंदाजामध्ये 5 टक्के कमी-अधिक तफावत असू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस बरसेल असा दावाही त्यांनी केला आहे. डॉ. साबळे यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. या वर्षी वार्याचा ताशी वेग कमी आढळल्याने महाराष्ट्रातील सर्वच भागात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसर्या पंधरवड्यापासून आँगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल, असे त्यांनी सांगितले.
यंदा पावसाचे वितरण असमान राहण्याची चिन्हे आहेत. राज्यातील धुळे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि पुण्याचा पूर्व भाग अशा काही भागांमध्ये पावसाचे मोठे खंड पडण्याची दाट शक्यता असल्याने स्थिती काहीशी चिंताजनक राहू शकते. या खंडांचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकर्यांनी यंदा कमी कालावधीची, कमी पाण्याची आणि आंतरपीक पद्धतीचा प्रामुख्याने अवलंब करावा, असे आवाहन डॉ. साबळे यांनी केले.

COMMENTS