मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात शेतीमाल अडकून पडला आहे. कांदा, तांदूळ, साखर, द्रा

मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात शेतीमाल अडकून पडला आहे. कांदा, तांदूळ, साखर, द्राक्षे यांसारख्या मालाचा साठा दीर्घकाळ पडून राहिल्याने त्यातील काही हिस्सा सडू लागला आहे. थंड साठवणुकीचे वाढते भाडे आणि निर्यातीतील अडथळे यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मार्च-एप्रिल हा हंगाम आंबा निर्यातीसाठी महत्त्वाचा मानला जातो; मात्र यंदा आखाती देशांकडे जाणारी निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. परिणामी, आंबा उत्पादकांसह इतर पिकांच्या शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शेट्टी यांनी सांगितले की, आखाती प्रदेशातील तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम शेती निर्यातीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरणातील समतोल साधण्यात त्रुटी राहिल्याचा आरोप त्यांनी केला. इंधन पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा शेती व निर्यातीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. निर्यातीसाठी हवाई मार्गाचा पर्याय विचारात घेण्यात आला असला तरी त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा वेळी शासनाने विमान सेवा कंपन्यांशी समन्वय साधून सवलतीचे दर उपलब्ध करून द्यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करारांच्या पार्श्वभूमीवरही शेतकरी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. परदेशातून स्वस्त शेतीमाल आयात होण्याची शक्यता निर्माण झाल्यास देशातील शेतकर्यांचे उत्पन्न कोलमडण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याविरोधात ठोस भूमिका घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय, आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने इंधन आणि रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS