अहिल्यानगर : इतरांचे भविष्य सांगत लोकांची दिशाभूल करणार्या भोंदू अशोक खरातचे स्वतःचेच भविष्य आता अंधकारमय बनले आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीत त

अहिल्यानगर : इतरांचे भविष्य सांगत लोकांची दिशाभूल करणार्या भोंदू अशोक खरातचे स्वतःचेच भविष्य आता अंधकारमय बनले आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीत त्याच्या कथित गैरप्रकारांची मालिका उघड होत असून, त्याच्यावर आतापर्यंत एकूण बारा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, सततची चौकशी आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे त्याची प्रकृती खालावत चालल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी आठ गुन्हे महिलांचे शोषण, फसवणूक आणि जादूटोण्याशी संबंधित आहेत, तर उर्वरित चार गुन्हे आर्थिक गैरव्यवहाराशी निगडित आहेत. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून, दररोज समोर येणारे व्हिडिओ आणि नव्या तक्रारींमुळे तपास यंत्रणांसमोरही आव्हाने उभी राहत आहेत. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी समाजात मुक्तपणे वावरणारा खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. या काळात त्याचे वजन झपाट्याने कमी झाल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय तपासणीत काही दिवसांपूर्वी त्याचे वजन सुमारे एकोणऐंशी किलो होते, मात्र त्यानंतर सहा ते सात किलोने घट झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याला विविध आजारांचा त्रास असून, सततच्या चौकशीमुळे मानसिक तणावही वाढल्याचे दिसून येते. खरातला काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याचे परिणाम अद्याप जाणवत असून, एका हाताची हालचाल व्यवस्थित होत नसल्याची माहिती आहे. सध्या त्याच्यावर कोठडीतच औषधोपचार सुरू आहेत; मात्र प्रकृती अपेक्षित साथ देत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात नुकताच बारावा गुन्हा दाखल झाला आहे. एका कांदा व्यापार्याने ही तक्रार दिली असून, त्यात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, खरातने संबंधित व्यापार्याला प्लॉट व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. वृद्धाश्रमाच्या नावावर सुमारे साठ लाख रुपयांची जागा अवघ्या बावीस लाख पंचवीस हजार रुपयांत खरेदी करून घेतली. त्यानंतर अधिक चांगल्या ठिकाणी जागा देण्याचे आश्वासन देत तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये उकळले; मात्र प्रत्यक्षात कोणतीही जागा दिली नाही.
कांदा व्यापार्याचा मानसिक छळ
फसवणुकीसोबतच मानसिक छळाचाही आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. व्यापार्याने पैशांचा किंवा जागेचा मागणीचा आग्रह धरल्यानंतर, तगादा लावू नकोस, अन्यथा देवाचा कोप होईल, अशी भीती दाखवून त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे संबंधित व्यापारी दीर्घकाळ मानसिक तणावाखाली होता.


COMMENTS