नांदेड : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण प्रकरणावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाला असून दोन्ही समाज आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहिले आह
नांदेड : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण प्रकरणावरुन दोन समाजात तेढ निर्माण झाला असून दोन्ही समाज आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. या उपवर्गीकरणाच्या विषयावर योग्य तोडगा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. देविदास मनोहरे, जनार्दन कवडे, ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे आणि नंदकुमार बनसोडे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश गायकवाड म्हणाले की, उपवर्गीकरणाचा विषय सुरू झाला त्यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा विषय पुढे आला आहे. दोन समाज अशा प्रकारे आमनेसामने येणे योग्य नाही. भविष्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि आदिवासी समाजातही उपवर्गीकरणाची मागणी पुढे येऊन सामाजिक दुफळी माजण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठीच हा विषय पुढे आणल्याचा आरोप करत दोन समाजात यामुळे तणाव निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदीर्घ संसदीय अभ्यास असून विविध समाजांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद आहे. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करत या प्रश्नातून मार्ग काढावा, अशी विनंती गायकवाड यांनी केली. तसेच राज्य सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार किंवा हस्तक्षेप याचिका दाखल करावी, अशी मागणीही त्यांनी केली. नांदेड जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्च्याबाबत बोलताना ते म्हणाले की, केवळ मोर्चे काढून प्रश्न सुटत नसून, शासन आणि राजकीय स्तरावर चर्चा आणि वाटाघाटी करूनच यावर अंतिम तोडगा निघू शकेल.

COMMENTS