देवळाली प्रवरा - रेबीज या गंभीर आजाराबाबत असलेला जनजागृतीचा अभाव आणि कुत्रा चावल्यानंतर तातडीने घ्यावयाच्या उपचारांची माहिती नसल्याने राहुरी शहरा

देवळाली प्रवरा – रेबीज या गंभीर आजाराबाबत असलेला जनजागृतीचा अभाव आणि कुत्रा चावल्यानंतर तातडीने घ्यावयाच्या उपचारांची माहिती नसल्याने राहुरी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील विश्वास संताराम जगधने (वय ५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोग्य विभागाने रेबीजबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये विश्वास जगधने यांना कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्यावेळी रेबीज प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व आणि तातडीच्या उपचारांबाबत योग्य माहिती न मिळाल्याने त्यांचे वेळेत लसीकरण झाले नाही. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना प्रथम अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणि तेथून नायडू रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. विश्वास जगधने यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने लक्ष्मीनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी राहुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आरोग्य यंत्रणेकडून रेबीज प्रतिबंधक लस आणि उपचाराबाबत मार्गदर्शन प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉक्टरांचे उपचाराकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन कुत्रा चावल्यानंतर जखम तातडीने साबण आणि वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवावी. त्यानंतर विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार रेबीज प्रतिबंधक लसीकरण व आवश्यक उपचार पूर्ण करावेत. कुत्रा चावल्याने रेबीजचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जखम किरकोळ वाटली तरी उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येते.
कुत्रा चावल्यास मालकावर कारवाई होते? पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यास प्रत्येक प्रकरणात मालकावर थेट गुन्हा दाखल होतोच असे नाही. मात्र कुत्रा सांभाळताना मालकाने निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास परिस्थितीनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. प्राण्याबाबत निष्काळजीपणा, निष्काळजीपणामुळे दुखापत तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार कारवाईची तरतूद आहे. कुत्र्याची नोंदणी, लसीकरण आणि सार्वजनिक ठिकाणी नियंत्रणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास नगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते.

COMMENTS