नायगाव: यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असले, तरी त्यानंतर झालेल्या समाधानकारक व मुबलक पावसामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांमध्ये नव्या

नायगाव: यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असले, तरी त्यानंतर झालेल्या समाधानकारक व मुबलक पावसामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. पेरणीची कामे पूर्ण होताच अनेक शेतकरी कुटुंबांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारीचा मार्ग धरला असून, यंदाच्या वारीत मराठवाड्यातील शेतकर्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
चांगल्या पावसामुळे यंदा पीक चांगले येईल, या आशेने शेतकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गस्थ झाले आहेत. भगवे झेंडे, शुभ्र पोशाख, डोक्यावर गांधी टोपी आणि मुखात अखंड विठ्ठलनाम यामुळे वारीचा मार्ग भक्तिमय झाला आहे. दिंड्यांमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात वारी पुढे सरकत असून, सर्वत्र भक्ती, समर्पण आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बच्चेवार यांच्याशी संवाद साधताना एका वारकर्याने सांगितले, वेळेवर पेरणी झाली नसली, तरी नंतर झालेल्या भरपूर पावसामुळे यंदा पीक चांगले येईल, अशी आशा आहे. हीच आनंदाची भावना मनात ठेवून आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी झालो आहोत. पावसामुळे शेतीची चिंता काही प्रमाणात कमी झाल्याने यंदा अनेक शेतकरी कुटुंबांनी आषाढी वारीत सहभागी होत विठ्ठल चरणी कृतज्ञता व्यक्त केली. शेती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम यंदाच्या वारीत अनुभवायला मिळत असून, विठ्ठल नामाच्या गजराने पंढरपूरकडे जाणारे मार्ग भक्तिमय झाले आहेत.
अन्नदान सेवेचा आनंद
आषाढी पंढरपूर वारीत बालाजी बच्चेवार यांचे भाचे भागवत लोकमनवार व गंगाधर शकरवार यांच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून आयोजित करण्यात येणार्या तीन दिवसांच्या अन्नदान सेवेत सहभागी होण्याचे भाग्य लाभत असल्याचे बालाजी बच्चेवार यांनी सांगितले. हजारो वारकर्यांची सेवा करण्याचा हा अनुभव अत्यंत समाधानकारक व आनंददायी असून, वारकर्यांची सेवा हीच विठ्ठलाची खरी पूजा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS