मुंबई: मुंबईतील उपनगरी रेल्वेमध्ये एका किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या थर


मुंबई: मुंबईतील उपनगरी रेल्वेमध्ये एका किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव असून, अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पावसाचे पाणी आणि दरवाजा बंद करण्यावरून वाद
काल रात्री मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. लोकलच्या डब्यात पावसाचे पाणी आत येत असल्याने, मयंक लोहार याने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका सहप्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले. मात्र, याच साध्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच हा वाद थेट विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात आरोपीने थेट चाकू काढून मयंकवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयंकचा जागीच मृत्यू झाला.
काही तासांतच आरोपीला कुर्ला येथून अटक
घटनेनंतर धावत्या लोकलचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रेल्वे पोलिसांनी तात्काळ विशेष पथके नियुक्त करून तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत अवघ्या काही तासांतच आरोपीचा शोध घेतला आणि त्याला कुर्ला परिसरातून बेड्या ठोकल्या. या धक्कादायक घटनेमुळे मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे.

COMMENTS