श्रीरामपूर : भारतीय स्त्री ही कुटुंबनीती आणि जीवनसंस्कृतीचा आदर्श सांगणारी असून माजी प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील यांच्या जीवनदर्शनाचा आदर्श स

श्रीरामपूर : भारतीय स्त्री ही कुटुंबनीती आणि जीवनसंस्कृतीचा आदर्श सांगणारी असून माजी प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील यांच्या जीवनदर्शनाचा आदर्श सांगणारा ‘अमृतमंथन’ गौरवग्रंथ महिला सक्षमीकरणाला जीवनप्रेरक असल्याचे मत इंदिरा नगर महिला ग्रुपच्या सौ. सुनंदा फकिरा वाघमारे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरा नगर भागातील महिला ग्रुपतर्फे माजी प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील यांच्या अमृतमहोत्सवी जीवनवाटेवर प्रकाशित झालेल्या ‘अमृतमंथन’ गौरवग्रंथ परिसंवादात सौ. सुनंदा वाघमारे बोलत होत्या. प्रारंभी या गौरव ग्रंथाचे संपादक डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी ग्रंथ परिचय करून दिला, तर वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सर्वांचे स्वागत करून सन्मान केला. यावेळी श्रीमती लक्ष्मी गाढे, सौ. शोभा मोरे, सौ. प्रमिला वाबळे, सौ. सविता जपे, सौ. रोहिणी गुंड, सौ. वैशाली गाढे आदींनी अमृतमंथन गौरवग्रंथाचे कौतुक केले.
सुनंदा वाघमारे पुढे म्हणाल्या, माजी प्राचार्य सौ. मंगल श्रीधर पाटील यांनी श्रीरामपूरमध्ये विज्ञान शिक्षिका म्हणून २५ वर्षे अध्यापन केले. त्यांनी व त्यांचे पती प्रा. एस. सी. पाटील यांनी बाबूराव उपाध्ये यांना शिक्षण घेण्यासाठी खूप सहकार्य केले, त्यांना आई-वडिलांप्रमाणे आधार दिला. डॉ. उपाध्ये यांनी प्राचार्य सौ. मंगल पाटील यांचा अमृतमंथन गौरवग्रंथ प्रकाशित करून आपली ऋणभावनाच व्यक्त केली आहे, असे सांगून प्राचार्य सौ. मंगल पाटील यांच्या सूनबाई प्रा. डॉ. नेहा नितीन पाटील यांनीही संपादक म्हणून चांगले सहकार्य केले आहे, त्यांचेही अभिनंदन आहे, असे सांगितले. सौ. मंदाकिनी उपाध्ये म्हणाल्या, अमृतमंथन हा गौरवग्रंथ २३७ पृष्ठांचा असून या ग्रंथात ३७ प्रकरणे आहेत. श्रीरामपूर येथील आसरा प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ. मोहिनी शिवाजी काळे यांनी सुंदर पद्धतीने अशी ग्रंथनिर्मिती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सौ. उपाध्ये यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS