मुंबई : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर एचएसआरपी क्रमांकफलक बसविण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत मंगळवार, 30 जून रो
मुंबई : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर एचएसआरपी क्रमांकफलक बसविण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत मंगळवार, 30 जून रोजी संपुष्टात आली आहे. यानंतर आज 1 जुलैपासून एचएसआरपी क्रमांकफलक नसलेल्या वाहनांवर परिवहन विभागाकडून थेट आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिला आहे.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, वाहनधारकांच्या सोयीसाठी शासनाने आतापर्यंत अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, यापुढे कोणतीही अतिरिक्त मुदत देण्याचा विचार नसून नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. राज्य आणि देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एचएसआरपी क्रमांकफलक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. विविध गंभीर घटनांनंतर संशयास्पद वाहनांची तत्काळ ओळख पटविणे आणि तपास यंत्रणांना मदत मिळावी, यासाठी उच्च सुरक्षा असलेले क्रमांकफलक अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांची माहिती अचूकपणे नोंदविणे, नियमभंग करणार्यांवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करणे शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वाहनधारकांनी एचएसआरपी क्रमांकफलकासाठी केवळ शासनाने मान्यता दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत व्यक्ती, दलाल किंवा एजंट यांच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. वाहन सुरक्षेला प्राधान्य देत प्रत्येक वाहनधारकाने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
राज्यभर विशेष तपासणी मोहीम
मुदत संपल्यानंतर मंगळवारपासून परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस संयुक्तपणे राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविणार आहेत. एचएसआरपी क्रमांकफलक नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणार्यांना आर्थिक दंडासह इतर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून एचएसआरपी क्रमांकफलक बसवून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

COMMENTS