मुंबई : मान्सूनच्या आगमनाला सुरुवातीला विलंब झाला असला तरी आता राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, कोकण, मध्य महा
मुंबई : मान्सूनच्या आगमनाला सुरुवातीला विलंब झाला असला तरी आता राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागांत दमदार पाऊस झाल्यानंतर पुढील पाच दिवसही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तीन आणि चार जुलै रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईसाठीही उद्याचा नारिंगी इशारा कायम ठेवण्यात आला आहे. काही भागांत शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यासाठी सलग पाच दिवस आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण रायगडमध्ये पुन्हा पावसाने जोर धरल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा वेग कायम राहिल्यास भातलागवडीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. ग्रामीण भागात जलसाठ्यांमध्ये वाढ होत असल्याने आगामी हंगामासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती कायम आहे. तसेच मध्य प्रदेशापासून सौराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा मार्गे अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा सक्रिय झाल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालींच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS