अकोले: महावितरणच्या ३३/११ केव्ही कोतूळ उपकेंद्राचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, 'सहाय्यक अभियंता' हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने ग्रा

अकोले: महावितरणच्या ३३/११ केव्ही कोतूळ उपकेंद्राचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, ‘सहाय्यक अभियंता’ हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याने ग्राहकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. या उपकेंद्राचा अतिरिक्त कार्यभार ब्राह्मणवाडा येथील कक्ष अभियंत्यांकडे आहे, जे आठवड्यातून केवळ एकच दिवस उपस्थित राहत असल्याने नागरिकांची आणि शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.
सध्या कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच चुकीच्या मीटर रीडिंगमुळे बिलिंगमध्ये त्रुटी निर्माण होत आहेत, ज्या दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे आणीबाणीच्या वेळी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
कोतूळ उपकेंद्र हे १५ एमव्हीए क्षमतेचे असून, यावर ६ हजार १४० घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक, ४० पाणीपुरवठा योजना आणि २ हजार ४०० शेती पंप ग्राहक अवलंबून आहेत. सध्या ११ केव्हीचे ७ फीडर कार्यरत असून, नवीन फीडरचे कामही प्रगतीपथावर आहे. एवढा मोठा व्याप आणि दोन सबस्टेशनचा कामाचा ताण एका दिवसाच्या उपस्थितीत पेलणे अशक्य बनले आहे. महावितरणने तातडीने रिक्त पद भरले नाही आणि कारभारात सुधारणा केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS