अहिल्यानगर: शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी उघडे पडलेले ड्रेनेज नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्र


अहिल्यानगर: शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी उघडे पडलेले ड्रेनेज नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते, मात्र ड्रेनेजवरील झाकणे तुटल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने या उघड्या ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित झाकणे बसवावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बालिकाश्रम रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास
शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बालिकाश्रम रस्त्यावर ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी, चारचाकी वाहने तसेच शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात. मात्र, अनेक ठिकाणी गटारींवरील झाकणे तुटलेली किंवा पूर्णपणे निखळून गेल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पाणी साचल्यास हे उघडे ड्रेनेज नजरेस पडत नाहीत, ज्यामुळे गंभीर अपघात घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा या समस्येबाबत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा, ती टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित नवीन झाकणे बसवावीत, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS