Homeताज्या बातम्या

विष्णुपुरी धरणातील पाणीसाठा तळाला; नांदेडवर पाणीटंचाईचे संकट, जलतरण तलाव आणि हॉटेलांना होणारा पाणीपुरवठा कपात होणार?

नांदेड | प्रतिनिधी : मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि विष्णुपुरी धरणातील झपाट्याने घटणारा पाणीसाठा यामुळे नांदेड शहरावर गंभीर पाणीटंचाईचे संकट

नायगावमधील ‘त्या’ ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा; अन्यथा लातूर कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांची ‘संगीत संध्या’
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजय निश्चित असल्याचा अशोकराव चव्हाण यांचा दावा
नांदेड जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक -  Marathi News | Nanded District Drought Vishnupuri Dam 30 percent water  reserve Latest Marathi News | TV9 Marathi

नांदेड | प्रतिनिधी : मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि विष्णुपुरी धरणातील झपाट्याने घटणारा पाणीसाठा यामुळे नांदेड शहरावर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध साठा तळाला पोहोचल्याने महानगरपालिका प्रशासनासमोर पिण्याच्या पाण्याचे नियोजन हे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत चर्चा सुरू झाली असून, शहरातील महापालिकेच्या तसेच खासगी जलतरण तलावांवर निर्बंध घालण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

उन्हाळ्याच्या तीव्रतेनंतर अपेक्षित वेळेत मान्सून दाखल न झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी आणि अत्यावश्यक गरजांसाठी करण्याची गरज व्यक्त होत आहे. जलतरण तलावांच्या देखभालीसाठी आणि नियमित वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात महापालिकेच्या जलतरण तलावांसह खासगी स्विमिंग पूल काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

तसेच शहरातील काही मोठ्या हॉटेल्सना २४ तास पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची उपलब्धता कमी होत असताना या हॉटेलांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन व्यावसायिक वापरावर मर्यादा आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींकडूनही पाणी बचतीसाठी कठोर निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, जलतरण तलावांचा वापर, तसेच अनावश्यक पाण्याचा वापर यावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने अद्याप जलतरण तलाव बंद ठेवण्याबाबत किंवा हॉटेलांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला, तरी परिस्थिती गंभीर झाल्यास कठोर उपाययोजना करण्याची वेळ येऊ शकते, असे संकेत प्रशासनातील सूत्रांकडून मिळत आहेत. मान्सूनला आणखी विलंब झाल्यास नांदेडकरांना पाणी कपात, पर्यायी दिवसाआड पाणीपुरवठा आणि पाण्याच्या वापरावर निर्बंध अशा उपाययोजनांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS