पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी सकाळी शाईफेक आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी सकाळी शाईफेक आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांवर आरोप करण्यात आले असून, वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद अधिक चिघळल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे आळंदी परिसरात एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते पुण्याकडे परतत असताना काही वाहनांतून आलेल्या व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही जणांकडे शस्त्रे होती आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही दावा लवांडे यांनी केला. घटनेनंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या घटनेनंतर विकास लवांडे यांनी एक चित्रफीत प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपासून आपण वारकरी संप्रदायातील कथित कट्टरवादी प्रवृत्तींबाबत भूमिका मांडत होतो. त्याचाच राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीची घुसखोरी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही एका लेखातून समतेचा आणि प्रबोधनाचा वारसा जपणार्या या परंपरेत काही अतिरेकी विचार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर विकास लवांडे यांनी काही कीर्तनकार आणि प्रवचनकारांची नावे जाहीर करत त्यांच्यावर वारकरी परंपरेच्या मूलभूत विचारांना धक्का पोहोचवल्याचा आरोप केला होता. या यादीत अनेक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.
सामजिक प्रबोधनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : आ. रोहित पवार

या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी सामाजिक प्रबोधनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हल्लेखोरांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
पदाधिकार्यावर हल्ला होणे गंभीर बाब : खा. सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. भररस्त्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यावर हल्ला होणे गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, वारकरी संप्रदाय, सामाजिक प्रबोधन आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यांभोवतीचा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS