नांदेड : मराठा आरक्षण आंदोलनानंतर जात प्रमाणपत्र मिळालेल्या, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना अडचणी येत असलेल्या प्रकरणांबाबत शासन सकारात्मक
नांदेड : मराठा आरक्षण आंदोलनानंतर जात प्रमाणपत्र मिळालेल्या, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना अडचणी येत असलेल्या प्रकरणांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असून, मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मराठा आरक्षण आंदोलनानंतर पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत काही प्रशासकीय अडचणी आणि संभ्रम निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या विषयासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असून, उदय सामंत हे या समितीचे सदस्य आहेत. या संदर्भात विखे पाटील यांच्याशी तातडीने चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गरज भासल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करून मराठा समाजाच्या अपेक्षेनुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय अडथळा न येता वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

COMMENTS