कुंडलवाडी : आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढविणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खरीप
कुंडलवाडी : आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढविणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. यंदापासून स्पर्धेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, बिलोली तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शेशिकांत तिडके यांनी केले आहे.
या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर घेतली जाणार असून, प्रत्येक स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतजमीन संबंधित शेतकर्याच्या नावावर असणे आवश्यक आहे. अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्काची पावती, आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र आणि बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. मूग व उडीद पिकांसाठी अर्जाची मुदत संपली आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकर्यांना आपल्या शेतीतील उत्पादन क्षमता सिद्ध करण्याची तसेच तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे बिलोली तालुक्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन बिलोली तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शेशिकांत तिडके यांनी केले आहे.

COMMENTS