नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’ या गीताला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच समान दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंतप्रध

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’ या गीताला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच समान दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रीय गौरव अपमान निवारण कायद्यात बदल करण्यासही हिरवा कंदील देण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, ‘वंदे मातरम्’वरही राष्ट्रगीतासारखेच नियम लागू होतील. म्हणजेच, या गीताचा अपमान करणे किंवा त्याच्या गायनात जाणूनबुजून अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरेल. अशा प्रकारच्या कृतीसाठी कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सरकारकडून या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. प्रस्तावित बदलांनुसार, जर कोणी ‘वंदे मातरम’च्या सादरीकरणात अडथळा आणला, तर त्याला तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. पुन्हा गुन्हा केल्यास किमान एक वर्षाची शिक्षा अनिवार्य असेल. केंद्राने ‘वंदे मातरम’च्या सादरीकरणासाठी काही स्पष्ट नियम निश्चित केले आहेत. अधिकृत आवृत्तीत सहा कडवी असून तिचा कालावधी सुमारे तीन मिनिटे दहा सेकंद इतका आहे. ही आवृत्ती प्रमुख शासकीय समारंभांमध्ये सादर करण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रध्वज फडकावणे, राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम, तसेच त्यांच्या भाषणांपूर्वी किंवा नंतरच्या प्रसंगी हे गीत सादर केले जाईल. एखाद्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ आणि ‘जन गण मन’ दोन्ही सादर करायचे असल्यास, प्रथम ‘वंदे मातरम’ आणि त्यानंतर राष्ट्रगीत सादर केले जाईल. या दोन्ही वेळी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहणे अपेक्षित आहे.

COMMENTS