मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय! शिवसेना नेते संजय निरुपम आज दहिसरमध्ये रिक्षाचालकांशी संवाद साधायला गेले खरे, पण त

मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय! शिवसेना नेते संजय निरुपम आज दहिसरमध्ये रिक्षाचालकांशी संवाद साधायला गेले खरे, पण तिथे मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
विषय होता रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २०१९ चा जीआर लागू करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यानुसार १ मे नंतर रिक्षाचालकांची मराठीची चाचणी होणार आहे. यात नापास झाल्यास परमिट रद्द होऊ शकतं. याच मुद्द्यावर संजय निरुपम यांनी दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये अमराठी चालकांशी चर्चा केली. मात्र, ‘मराठीला विरोध केल्यास धडा शिकवू’, असा इशारा देत मनसेचे नयन कदम आणि कुणाल मईणकर कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
संजय निरुपम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, “महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोललंच पाहिजे, यावर आमचं दुमत नाही. पण मराठीच्या नावाखाली जोर-जबरदस्ती, गुंडगिरी आणि धमकावणे चुकीचे आहे. परमिट रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी मी पत्राद्वारे मागणी केली आहे.” निरुपम यांची सभा संपवून निघत असतानाच, मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं.

COMMENTS