भोकर : भोकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यालगत अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटविण्याचे प्रशासनान

भोकर : भोकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यालगत अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटविण्याचे प्रशासनाने कडक निर्देश दिल्याने संबंधित दुकानदार व व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने अनेक दुकानदारांनी मुदत संपण्यापूर्वीच स्वतःहून आपली दुकाने हटविण्यास सुरुवात केली आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, कायदा सर्वांसाठी समान असून कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हे या कारवाईतून स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, दुसरीकडे या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून याच दुकानांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या छोट्या व्यावसायिकांसमोर रोजगारासह त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांचे संपूर्ण आर्थिक गणित या व्यवसायावर अवलंबून असल्याने दुकाने हटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबांवर बेरोजगारी व उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अतिक्रमण हटविणे आवश्यक असले तरी या व्यावसायिकांचे काय? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. संबंधित व्यावसायिकही याच शहराचे नागरिक असून, अनेक वर्षांपासून ते येथे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कायद्याची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोनातून त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.
अचानक व्यवसाय बंद झाल्यास अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता असल्याने अतिक्रमण हटविण्यासोबतच पात्र व्यावसायिकांसाठी पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकीकडे शहरातील अतिक्रमणमुक्त रस्ते व वाहतुकीसाठी प्रशासनाची कारवाई महत्त्वाची आहे, तर दुसरीकडे या कारवाईमुळे बेरोजगार होणार्या कुटुंबांचे पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासन आता या दोन्ही बाबींचा समतोल कसा साधते, याकडे भोकरकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS