Homeताज्या बातम्यासंपादकीय

विवेकवादाची पेरणी

आपल्या विवेकनिष्ठ विचारांनी आणि वस्तूनिष्ठ दृष्टीकोनाने आपली उभी ह्यात अंधश्रद्धा निमूर्लन करण्यासाठी खर्ची घातलेल्या एका विवेकनिष्ठाला गोळ्या घा

कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?
आयुष्याची दोर बळकट करायची की पंतगांची ?
राजकारणातील मूल्ये आणि नैतिकता

आपल्या विवेकनिष्ठ विचारांनी आणि वस्तूनिष्ठ दृष्टीकोनाने आपली उभी ह्यात अंधश्रद्धा निमूर्लन करण्यासाठी खर्ची घातलेल्या एका विवेकनिष्ठाला गोळ्या घालून त्याची हत्या करण्याचा प्रकार दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात घडला. दहा वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली, मात्र या दहा वर्षानंतर देखील त्यांचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना आणि सीबीआयला यश मिळालेले नाही. ही हत्या पूर्वनियोजित करून केली होती, मात्र त्याच्या मूळापर्यंत पोलिस पोहचू शकले नाहीत, याचेच महाराष्ट्राला दुःख आहे. त्याचबरोबर विवेकावादाची पेरणी करणार्‍या दाभोळकरांची हत्या करावी असे, सनातनी प्रवृत्तीला का वाटले असावे बरे. खरंतर डॉक्टरांनी महाराष्ट्राला डोळस करण्यासाठी सातत्याने मांडणी केली. दाभोळकरांनी 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची संघटना सुरू केली होती. ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्न सुरू असतांना, महाराष्ट्रात प्रभावी कायदा नसल्यामुळे धूर्त साधू, संत, म्हणवून घेणारे, जादू-चमत्काराचा आश्रय घेणार्‍यांवर कारवाई होत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन कायदा करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि हा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आला. आणि येथूनच अनेकांची दुकानदारी बंद झाली. त्यामुळे दाभोळकरांना संपवण्याचाच कट काही शक्तींनी आखला आणि त्यांनी20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्‍वर पूलावर 4 गोळ्या झाडून हत्या केली होती. ही नियोजित हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र हा सुशिक्षित आणि अंधश्रद्धामुक्त झाला पाहिजे, यासाठी त्यांनी जन-जागृती केली. दाभोळकर म्हणायचे ‘आपण विज्ञानाची सृष्टी घेतली; पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. आपण विज्ञानाची करणी घेतली; पण विचारसरणी घेतली नाही. त्यांचे हे वाक्य किती महत्व अधोरेखित करतात. त्यांना एक अंधश्रद्धामुक्त समाज घडवायचा होता. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. मात्र त्यांचा शेवट त्यांची हत्या करण्यात झाला. दाभोळकरच नव्हे तर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी यासारख्या अनेक विचारवंतांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या. त्यांचे मारेकरी आजही दहा वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. तरी त्यांच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला अपयश आले आहे. काही संघटनाभोवती या कारवाईचा फास आवळण्यात येत होता, त्यांचा सहभाग स्पष्ट देखील होत असतांना, त्यांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत सरकार करू शकले नाही. किंबहून या तपास यंत्रणांवर दबाव असल्यामुळेच त्या निरपेक्ष तपास करू शकल्या नाहीत, असेच यातून दिसून येत आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, त्यांच्या चौकश्या केल्या, या हत्येसंबंधित पुरावे हाती घेतले, मात्र या घटनेच्या मूळाशी, किंवा मुख्य सुत्रधारापर्यंत पोलिस पोहचू शकले नाही, हीच या प्रकरणाची शोकांतिका म्हणावी लागेल. दाभोळकरांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण होत झाली आहे. या दहा वर्षांमध्ये सीबीआयच्या चुकीच्या तपासामुळं पहिली पाच वर्ष दाभोळकरांच्या हत्येचा खटला सुरूच होऊ शकला नाही. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासामुळे दाभोळकरांवर गोळ्या झाडणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. मात्र अजूनही दाभोळकरांच्या हत्येमागचे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. सूत्रधारांपर्यंत आपण पोहचू शकलो नाही, अशी खंत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने केली आहे. आमच्या मनात दु:खाची सल आहे. पण दाभोळकरांच्या हत्येचा सूत्रधार अजूनही सापडला नाही ही देखील सल आमच्या मनात असल्याचे अंनिसने यावेळी म्हटले आहे. तर दाभोळकरांची हत्या ही पुरोगामी विचारांवर ओरखडा नसून पुरोगामी विचारांवर पडलेला हा एक डाग आहे.

COMMENTS