गांधीनगर : गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडून सात जणांचा मृत्यू झाला. लखतर-विरमगाम मार्गावर पाय

गांधीनगर : गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडून सात जणांचा मृत्यू झाला. लखतर-विरमगाम मार्गावर पायी चालत जाणार्या भाविकांच्या समूहावर भरधाव वेगाने येणार्या मालवाहू वाहनाने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना लखतर तालुक्यातील भास्करपारा गावाजवळ पहाटे साधारण दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकोट येथून काही भाविक बहुचराजी मंदिराच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत होते. रस्त्याच्या कडेला चालत असताना मागून वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सहा भाविक आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जड वाहनाचा चालक अशा एकूण सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. धडकेची तीव्रता मोठी असल्याने काही भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. लखतर पोलिस ठाण्याचे निरीक्षक योगेश पटेल यांनी प्राथमिक तपासात वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दुर्घटनेनंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून भाविकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः धार्मिक यात्रांदरम्यान रस्त्यावरून पायी प्रवास करणार्यांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

COMMENTS