बीड : आज संपूर्ण वारकरी संप्रदाय जो दिसत आहे, त्यामागे पंढरपूरातील पुंडलिकाची आई-वडिलांप्रती असलेली सेवा हीच प्रेरणा आहे. आई-वडिलांची सेवा हेच जग

बीड : आज संपूर्ण वारकरी संप्रदाय जो दिसत आहे, त्यामागे पंढरपूरातील पुंडलिकाची आई-वडिलांप्रती असलेली सेवा हीच प्रेरणा आहे. आई-वडिलांची सेवा हेच जगातील सर्वात मोठे पुण्य आणि सर्वोच्च ईश्वरभक्ती आहे, असे प्रतिपादन शांतीब्रह्म नवनाथ बाबा यांनी केले.
ब्रम्हनाथ वस्ती येथे आयोजित हरिकीर्तन सेवेत अभंगाच्या भावार्थाचे विवेचन करताना त्यांनी वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पंढरपूर नगरीचे आणि भगवान विठ्ठलांच्या भक्तीचे मूळ कारण म्हणजे पुंडलिकाने केलेली आई-वडिलांची सेवा होय. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत सावता माळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार आणि संत चोखामेळा यांच्या संतपरंपरेचा उल्लेख करत वारकरी संप्रदायाच्या विचारांची महती सांगितली. आजचा तरुण वर्गाने आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आई-वडिलांच्या सेवेत संपूर्ण जगाचे हित दडलेले आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कीर्तन सोहळ्यास टाळकरी, माळकरी, वीणेकरी, मृदंगवादक, पेटीवादक तसेच शेकडो महिला-पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.

COMMENTS