Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करा…

एम.आय.एम.ची महापौर व आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करावे, अशी मागणी एमआयएम पक्षाने महापौर रोहिणीताई शेंडगे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदनाद्वार

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश ; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा
 शेतातील विहिरीतील मोटार व  पाईपची चोरी 
जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवणार्‍या दादावर कारवाई करा

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करावे, अशी मागणी एमआयएम पक्षाने महापौर रोहिणीताई शेंडगे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. मनपाच्या येत्या महासभेमध्ये अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करण्याचा ठराव सभा अजेंड्यावर घेऊन तो मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, कार्याध्यक्ष मतीन शेख, शहर विद्यार्थी अध्यक्ष सनाउल्ल्हा तांबटकर, इमरान शेख आदींच्या शिष्टमंडळाने महापौर शेंडगे व आयुक्त डॉ. जावळे यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले.

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व एम.आय.एम. पक्षाच्यावतीने अहमदनगरचे नाव बदलण्याबाबतचे राजकारण सध्या सुरू आहे. या विषयाबाबत अहमदनगरकर जनतेची एकजूट न बिघडता शहराचे नाव शाह शरीफ नगर असावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्यावतीने विनंती करीत आहोत की, अहमदनगर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऋणानुबंध अत्यंत जुना आहे. त्यांचे पूर्वज मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, शरीफजीराजे भोसले या सर्वजणांची कारकीर्द याच शहरात बहरली. त्यांनी येथे अनेक पराक्रम केले. इसवी सन 1624 सालची भातोडीची लढाई जगप्रसिध्द आहे. शहराजवळील भातोडी पारगाव येथे ही लढाई झाली होती. या लढाईमधे शिवरायांचे वडिल शहाजीराजे यांनी फार मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांनी गनिमी कावा वापरून भातोडीचा तलाव फोडला व शत्रूसैन्याला हरवले होते. या लढाईनंतर शहाजीराजेंना ’सरलष्कर’ हा किताब दिला गेला होता. याच लढाईत त्यांचे बंधु व शिवरायांचे चुलते शरीफजीराजे हे शहीद झाले. त्यांची समाधी आजही भातोडी या गावी आहे. शिवरायांच्या पूर्वजांचा पराक्रम सर्वांनी ध्यानात ठेवला पाहिजे व त्याला सलाम केला पाहिजे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिवरायांचे पूर्वज शहाजीराजे व शरीफजीराजे यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे व त्यांचे नाव सूर्य-चंद्र असेपर्यंत राहावे यासाठी मनपाच्या येत्या महासभेमधे ’शाह शरीफ नगर’ नाव देण्याबाबतचा ठराव सभा अजेंड्यावर घेऊन तो सर्वानुमते मंजूर करावा. शिवरायांच्य पूर्वजांचे आपण ऋणी राहावे म्हणून सर्व नगरसेवक हा ठराव बिनविरोध मंजूर करतील व कोणीच विरोध करणार नाही, असा विश्‍वासही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे आणि चुलते शरीफजीराजे यांच्या नावावरून ’शाह शरीफनगर’ असे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करावा, अशी मागणी करीत आहोत. त्यामुळे हा विषय तात्काळ मनपाच्या येत्या महासभेमधे अजेंड्यावर घ्यावा, असे नमूद करून पुढे म्हटले आहे की, छत्रपती शहाजीराजे भोसले यांची जयंती आज शनिवारी दि. 18 मार्च 2023 रोजी असल्याने आपण या जयंतीच्या दिवशी या ठराव मंजुरीचा संकल्प करून शिवरायांच्या पूर्वजांच्या पराक्रमाला उजाळा द्यावा तसेच शिवप्रेमी जनतेला शाह शरीफनगर या नावाची भेट द्यावी, असे सुचवण्यात आले आहे. तसेच, लवकरच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व एमआयएम पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांना भेटून शाह शरीफ नगर या नावाला समर्थनाची मागणी करणार आहोत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे

आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून… एमआयएमतर्फे या निवेदनात म्हटले आहे की, आपण (महापौर) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना व त्यांच्या पूर्वजांना मानणार्‍या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेना पक्षाच्या लोकप्रिय लोक प्रतिनिधी तसेच आमच्या लोकप्रतिनिधी असून अहमदनगरकरांच्या भावना समजून घेऊन अहमदनगरचे नाव शाह शरीफ नगर करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करीत आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS