Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्नदान सेवेची झाली वर्षपूर्ती

येथील आनंदधाम फाउंडेशनच्या अन्नसेवेची नुकतीच वर्षपूर्ती झाली. यानिमित्त पुरणपोळी, आमटी, भाताचे जेवण देण्यात आले.

‘समृद्धी’च्या 26 किलोमीटरच्या सर्व्हिस रोडसाठी 52 कोटी मंजूर
लांडग्याने 4 गावातील 10 जणांवर हल्ला करून केले जखमी l Lok News24
आर्थिक शिस्त पाळणार्‍या वित्तीय संस्था यशस्वी ः माजी खा. तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील आनंदधाम फाउंडेशनच्या अन्नसेवेची नुकतीच वर्षपूर्ती झाली. यानिमित्त पुरणपोळी, आमटी, भाताचे जेवण देण्यात आले. या अन्नसेवेच्या उपक्रमातून आनंद महिमा किती महान आहे याची प्रचिती येते, अशी भावना युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांनी व्यक्त केली. 

या अन्नदान सेवेचा आतापर्यंत दोन लाखावर लोकांनी लाभ घेतला आहे. आनंदऋषीजी समाधी स्थळाजवळील आनंदधाम भक्तनिवाससमोर नाममात्र 10 रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी, तीन चपाती, ठेचा, चटणी तसेच पुलाव, दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात व आनंदऋषीजी स्मृतीनिमित्त सुरू केलेल्या या अन्नदान सेवेला वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महेंद्रऋषीजी महाराज व हितेंद्रऋषीजी महाराज यांनी मांगलिक दिली. यावेळी मर्चंटस बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, उद्योजक किशोर मुनोत (नेवासकर), आनंदधाम फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार चोपडा, उपाध्यक्ष भास्कर पवार, सचिव अभय लुणिया, खजिनदार आनंद चोपडा, अनिल दुगड, प्रितम गांधी, संतोष गांधी, रितेश सोनीमंडलेचा, प्रवीण मुनोत, चेतन मुथियान, नितीन शिंगी, राजू गांधी आदी उपस्थित होते.

आनंदधाम फाउंडेशनने अन्नदानाचे मोठे कार्य सुरू करीत भुकेलेल्यांना अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम आनंदधाम परिसरात चालवला आहे. या उपक्रमाची मागील महिन्यातील 28 मार्चला वर्षपूर्ती झालीे. आचार्यश्रींचा स्मृतीदिन आणि होळीचे औचित्य साधून आनंदधाम फाउंडेशनने यानिमित्त सर्वांना मोफत पुरणपोळी, आमटी,भात असे जेवण उपलब्ध करून दिले. यावेळी बोलताना महेंद्रऋषीजी महाराज म्हणाले, पूज्य आचार्यश्रींच्या आनंद नामाचा महिमा विलक्षण आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने सुरु झालेले कोणतेही सत्कार्य अखंड अविरत चालते. आनंदधाम फाउंडेशनने आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला. तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे. यातूनच आनंदमहिमा किती महान आहे याची प्रचिती येते. भुकेलेल्यांना सुग्रास, सकस अन्न देण्याचा हा उपक्रम मानवतेचे प्रतीक असून अशा मानवसेवेतूनच जग लवकर करोना महामारीतून मुक्त होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके म्हणाले, मागील वर्षी मार्चमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाल्यावर हातावर पोट असणारांसमोर रोजच्या जेवणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. त्यावेळी आनंदधाम फाउंडेशनने अन्नसेवेच्या कार्याला सुरुवात केली. जवळपास दोन-अडीच महिने या उपक्रमातून हजारो लोकांना रोजचे जेवण देण्यात आले. लॉकडाऊननंतरही हा उपक्रम चालूच ठेवत फक्त दहा रुपयात सकस जेवण उपलब्ध करून दिले आहे, ही मानवसेवा कौतुकास्पद असून भविष्यातही ती अशीच चालू राहील, असा विश्‍वास आहे, असे ते म्हणाले. मर्चंट बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत म्हणाले की, आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीला सुरु झालेला हा अन्नसेवेचा उपक्रम खरीखुरी मानवसेवा आहे. या कार्यात सहभागी होणे, योगदान देता येणे ही भाग्याची गोष्ट आहे. अशा उपक्रमातूनच माणुसकीचे नाते घट्ट होण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

खजिनदार आनंद चोपडा यांनी सांगितले की, सेवाभाव जपताना जेवण अतिशय हायजेनिक वातावरणात आणि चांगल्या साहित्यापासून तयार होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला असून भविष्यातही ही अन्नसेवा कायम चालू ठेवणार आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व साधू-साध्वीजींच्या आशीर्वादानेे प्रारंभ झालेल्या या सेवेसाठी पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले. याशिवाय जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्यासह विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट, शहरातील दानशूर मंडळींचे सक्रिय योगदान लाभत आहे, असे त्यांनी सांगितले. अभय लुणिया यांनी आभार मानले.

COMMENTS