नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून आम आदमी पक्ष अर्थात आपने आतापर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाल

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून आम आदमी पक्ष अर्थात आपने आतापर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी बंड पुकारत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सात खासदारांचा गट थेट भाजपमध्ये विलीन होत असल्याची घोषणा केली. या घडामोडीमुळे पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राघव चड्डा यांच्यासह संदीप पाठक, अशोक कुमार मित्तल, हरभजन सिंग, विक्रमजीत सिंग साहनी, स्वाती मालीवाल आणि संजीव अरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राघव चड्डा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप पाठक आणि अशोक मित्तल हेदेखील उपस्थित होते. 10 दिवसांपूर्वी (15 एप्रिल) ईडीने मित्तल यांच्या घरावर छापा टाकला होता. राघव चड्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यातील मतभेद गेल्या काही दिवसांपासून उघडपणे समोर येत होते. राज्यसभेतील उपनेतेपदावरून चड्ढा यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयानंतर पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला. चड्ढा यांनीही अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावर टीका करण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी आपल्या सहकार्यांसह पक्षत्यागाची घोषणा केली. यावेळी अशोक मित्तल, संदीप पाठक, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता हे खासदार उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रितपणे आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत नवा राजकीय मार्ग स्वीकारल्याचे सांगितले. चड्ढा यांनी स्पष्ट केले की, राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण दहा खासदार आहेत. त्यापैकी दोन तृतीयांश सदस्यांचा गट तयार करून संविधानातील तरतुदीनुसार हा गट भाजपमध्ये विलीन करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींकडे अधिकृत पत्र देण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. चड्ढा यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी पूर्वीपासूनच भाजपकडे झुकल्याचा आरोप केला होता.
राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढणार

आपच्या 7 खासदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवण्यास मदत होऊ शकते, तर आम आदमी पक्षाच्या विस्ताराच्या योजनांना मोठा धक्का बसू शकतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फूट निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
पक्ष एकसंध ठेवण्याचे केजरीवालांसमोर आव्हान

आपमध्ये प्रथमच मोठी फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यसभा आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची ताकद कमी होण्याची शक्यता असून संघटनात्मक परिणामही मोठ्या प्रमाणात जाणवू शकतात. लोकसभेत पक्षाचे प्राबल्य कमी असतांनाच, राज्यसभेतील सात खासदार भाजपमध्ये गेल्यामुळे पक्ष राष्ट्रीय पातळीवर कमकुवत होतांना दिसून येत आहे.

COMMENTS