नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आह

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या कार्याचा गौरव करणारा विशेष ठराव मंजूर करून अभिनंदन व्यक्त केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व करताना पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीची नोंद घेण्यात आली. सलग निवडणुकांमधून जनतेचा कौल मिळवत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेल्या निवडून आलेल्या पंतप्रधानांपैकी एक म्हणून त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे ठरावात नमूद करण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदी यांना अभिनंदनपर पत्र पाठविले. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, हा टप्पा केवळ कार्यकाळाच्या कालावधीपुरता मर्यादित नसून देशातील जनतेने सलग निवडणुकांमधून त्यांच्या नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. देशाच्या लोकशाही परंपरेत ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या राजकीय आणि विकासात्मक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती साधली असून जागतिक स्तरावर देशाचे स्थान अधिक मजबूत झाले असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये प्रथमच देशाची धुरा हाती घेतली होती. त्यानंतर 2019 आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकांमध्येही जनतेचा कौल मिळवत त्यांनी सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. या कालावधीत पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, सामाजिक कल्याण आणि परराष्ट्र संबंध या विविध क्षेत्रांत केंद्र सरकारने राबविलेल्या उपक्रमांमुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावात करण्यात आला आहे. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त देशभरातील विविध स्तरांवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या दीर्घकालीन नेतृत्वाची आणि जनाधाराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS