कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपासानुसार, वैयक्तिक संबंधांतील वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गाडीतून दुसर्या ठिकाणी नेत असताना पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.
मृत महिलेचे नाव सुरेखा शिवाजी न्यारे असे असून त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या प्रकरणी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40, रा. शिरगाव) याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरेखा न्यारे आणि संशयित आरोपी यांच्यात परिचय होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू होता. त्यातूनच आरोपीने शिरगाव परिसरातील एका म्हशीच्या गोठ्यात सुरेखा न्यारे यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. हत्येनंतर आरोपीने मृतदेह स्वतःच्या चारचाकी वाहनात ठेवून दुसर्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भिवंडी परिसरात पोलिसांनी संशयावरून वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या सामान ठेवण्याच्या भागाची पाहणी करताच त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली असता हत्येचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संदेश सर्जेराव मोरे (वय 27, रा. भिवंडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा, पुरावे संकलन आणि न्यायवैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू असून हत्येमागील नेमके कारण, घटनेचा कालक्रम आणि इतर संबंधित बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS