कुंडलवाडी : एकेकाळी ग्रामीण भागातील जेवणावळी, धार्मिक कार्यक्रम आणि सण-समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पळसाच्या पानांची पत्रावळी आज

कुंडलवाडी : एकेकाळी ग्रामीण भागातील जेवणावळी, धार्मिक कार्यक्रम आणि सण-समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पळसाच्या पानांची पत्रावळी आज हळूहळू इतिहासजमा होताना दिसत आहे. त्याचबरोबर केळीच्या पानांचाही वापर कमी होत असून, त्याजागी प्लास्टिक व थर्माकोलच्या ताटांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
पूर्वी पळसाच्या झाडांची विपुलता असल्याने गावागावांत महिलांकडून पत्रावळी तयार केल्या जात होत्या. यामुळे त्यांना रोजगारही मिळत असे. पळसाची पाने नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी असल्याने त्यावर जेवण करण्याला विशेष महत्त्व होते. मात्र, सध्या झाडांची घटती संख्या, मेहनतीचे वाढते प्रमाण आणि कमी दर यामुळे हा व्यवसाय जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. केळीच्या पानांबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी लग्नसमारंभ, जत्रा, धार्मिक विधींमध्ये केळीच्या पानांवर जेवण देण्याची परंपरा होती. परंतु आता वेळेअभावी आणि सोयीच्या दृष्टीने लोक प्लास्टिकच्या ताटांना प्राधान्य देत आहेत. पर्यावरण तज्ञांच्या मते, प्लास्टिक व थर्माकोलचा वाढता वापर हा पर्यावरणासाठी घातक ठरत असून, माती व पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत पळसाच्या पत्रावळ्या आणि केळीची पाने यांसारख्या पारंपरिक, जैवविघटनशील पर्यायांचा वापर पुन्हा वाढवण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांचे मत आहे की, शासनाने आणि ग्रामपंचायतींनी या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये पर्यावरणपूरक पत्रावळींचा वापर सक्तीचा केल्यास या व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकते. एकूणच, आधुनिकतेच्या लाटेत हरवणार्या या परंपरेला जपण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा येणार्या काळात पळसाच्या पानांची पत्रावळी आणि केळीची पाने फक्त आठवणीपुरतीच उरतील.

COMMENTS