ग्रामीण भागातील बेघर व गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रभावी प्रयत्न करण्यात येत

ग्रामीण भागातील बेघर व गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रभावी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत नांदेड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, तालुका स्तरावर माहूर तालुक्याने राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा मान मिळविला आहे.
महा आवास अभियान 2023-24 अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच मोदी आवास योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीत नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य करत राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच आदिवासी बहुल माहूर तालुक्याने उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्याचा बहुमान पटकावला आहे. या यशामागे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन योजनांचा आढावा घेतला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी सातत्याने पाठपुरावा करून अभियान गतिमान केले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. माहूर तालुक्यातही योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. लाभार्थ्यांना वेळेत घरे मंजूर करणे, बांधकाम पूर्णत्वास नेणे आणि शासनाच्या उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता करणे यामध्ये माहूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, दि. 15 मे रोजी सैनिक स्कूल, सातारा येथे होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

COMMENTS