बीड: धारूर तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कारभारात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार आणि सत्तेचा प्रचंड गै
बीड: धारूर तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कारभारात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागदावर महिला सरपंच असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचा मुलगा रविकिरण देशमुख आणि राजाभाऊ देशमुख हेच अनधिकृतपणे सही करून कारभार हाकत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (भटके विमुक्त विभाग) राज्यप्रमुख रविकांत राठोड यांनी थेट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आसरडोह ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आसरडोहमध्ये घरकुलाचा हप्ता सोडण्यासाठी लाभार्थ्यांकडून थेट पैसे उकळले जात असून माहिती मागणार्या ग्रामस्थांना दमदाटी केली जात आहे. स्मशानभूमीच्या कामात बोगस बिले काढून निधी हडप करण्यात आला, तर सर्व विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य असताना अधिकार्यांशी साठेलोटे करून आदर्श ग्रामपंचायतचा बोगस पुरस्कार पटकावल्याची पोलखोलही या तक्रारीत करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण (ऑडिट) करून सरपंच, ग्रामसेवक, ऑपरेटर आणि संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर ठेवावे, अशी ठाम मागणी राठोड यांनी केली आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

COMMENTS