तिरुवनंतपुरम: केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खल

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः इडुक्की, कोट्टायम आणि पठाणमथिट्टा या डोंगराळ जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले असून आपत्तीग्रस्त भागात यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये इडुक्की जिल्ह्यातील तीन आणि कोट्टायम जिल्ह्यातील दोन नागरिकांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरउतारावरील माती सैल झाल्याने अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे घरे, रस्ते आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
इडुक्की जिल्ह्यातील थोडुपूझा परिसरातील कुडायथूर येथील अडूरमला भागात भूस्खलनामुळे एक घर पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत सुमती नावाच्या महिलेचा आणि तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. याच घरात अडकलेल्या आणखी दोघांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. याच जिल्ह्यातील वागामोनजवळील कोलाहल्लामेडू परिसरात चिखल, दगड आणि झाडे घरावर कोसळल्याने ७२ वर्षीय प्रभाकरन नायर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
कोट्टायम जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन झाले. पूंजार परिसरात डोंगराचा मोठा भाग कोसळून एका घरावर मातीचा ढिगारा पडला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला. परिसरातील इतर घरांनाही धोका निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
पठाणमथिट्टा जिल्ह्यातील अनेक सखल भाग पावसाच्या पाण्याखाली गेले आहेत. राणी शहरासह अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ आणि डोंगरउताराजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS