मध्य पूर्वेत युद्धाचे ढग पुन्हा एकदा गडद झाले आहेत. इराणने संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) केलेल्या एका भीषण ड्रोन हल्ल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळ

मध्य पूर्वेत युद्धाचे ढग पुन्हा एकदा गडद झाले आहेत. इराणने संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) केलेल्या एका भीषण ड्रोन हल्ल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले असून भारताने आता या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
इराणने काल युएईच्या फुजैराह पेट्रोलियम औद्योगिक प्रकल्पाला लक्ष्य केले. या ड्रोन हल्ल्यानंतर पेट्रोलियम साइटवर भीषण आग भडकली. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने चार मिसाइल्स डागल्या होत्या, ज्यापैकी तीन एअर डिफेन्स सिस्टिमने नष्ट केल्या, तर एक समुद्रात पडले. मात्र, या ड्रोन हल्ल्याच्या तडाख्यात तीन भारतीय कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारताने इराणच्या या कृतीचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, “नागरी पायाभूत सुविधा आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे आम्हाला अजिबात मान्य नाही.” भारताने इराणला हा हिंसाचार तात्काळ थांबवण्याचा इशारा दिला असून चर्चा आणि कूटनीतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. केवळ हल्लाच नाही, तर सागरी सुरक्षेवरूनही भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून चालणारी जलवाहतूक इराण आणि अमेरिकेच्या वादामुळे बाधित झाली आहे. इराणकडून व्यापारी जहाजांवर बेकायदेशीरपणे टोल आकारला जात असल्याचा मुद्दाही भारताने मांडला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही जलवाहतूक अडथळ्याशिवाय सुरू राहिली पाहिजे, अशी भारताची ठाम मागणी आहे.
जखमी भारतीयांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी युएईमधील भारतीय दूतावास स्थानिक यंत्रणांच्या सतत संपर्कात आहे. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत चर्चेसाठी तयार असला तरी, भारतीयांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हेच या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे.

COMMENTS